रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ३०५ प्राथमिक शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार
रत्नागिरी : . राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने संच मान्यतेच्या नवीन नियमानुसार २० पट संख्या असलेल्या शाळांसाठी एकही शिक्षक पदाला मंजुरी न दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील १ हजार ३०५ प्राथमिक शाळांवर बंद होण्याची टांगती तलवार लटकू लागली आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाविरोधात अखिल भारतीय शिक्षक संघ आक्रमक झाला असून लवकरच न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.*
राज्य शासनाच्या संच मान्यतेनुसार या नवीन नियमाचा रत्नागिरी जिल्ह्यातील गाव वाड्या वस्तीवर सुरु असलेल्या प्राथमिक शाळांना मोठा फटका बसणार आहे. २० पटा पासून खाली असलेल्या एकाही शाळेला शिक्षक पद मंजूर करण्यात आलेले नाही. त्यामुळे गोरगरीबांची मुले शिकण घेत असलेल्या प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ हजार ३०५ शाळांना याचा फटका बसणार आहे. त्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम शासन स्तरावरुन केले जाणार असल्याने अखिल भारतीय शिक्षक संघ या निर्णया विरोधात आक्रमक झाला आहे. तसेच याविषयी न्यायलायात दाद मागण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.
शाळांच्या संच मान्यता निर्णया विषयी शिक्षणाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक बोलवण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०२५ मध्ये प्राथमिक शाळांची होणारी संच मान्यता अंमलात आल्यानंतर होणारी वास्तव स्थिती शासनासमोर मांडण्यासाठी बैठकीतून शिक्षण विभागाने संघटनेसमोर ठेवावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागात असणा-या शाळांच्या वास्तविकतेचा विचार न करता त्याची अमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे गोर गरीब मुलांच्या शाळा बंद होणार आहेत. मात्र शासनाने हा निर्णय मागे घेऊन गरिबांच्या मुलांचे शिक्षण सुरू ठेवावे. अशी मागणी शिक्षक संघाने दिलेल्या निवेदना द्वारे केली आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.