:बोगस शालार्थ आयडी घोटाळा!
महाराष्ट्रातील ५८० शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगाराचीही वसुली शक्य
मुख्यमंत्र्यांची गंभीर दखल; नागपूर विभागात पाच अधिकारी अटकेत, चंद्रपूरातील भरती प्रक्रियेवरही संशय
नागपूर : बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्त्यांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शासनाला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला असून, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. नागपूर विभागात ५ अधिकाऱ्यांना अटक झाली असून, तब्बल ५८० नियुक्त्या रद्द करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, बोगस नियुक्ती ठरल्यास संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेला पगारही वसूल केला जाणार आहे.
घोटाळ्याची साखळी उघड!
शिक्षण उपसंचालक कार्यालय, माध्यमिक शिक्षण विभाग व वेतन पथक कार्यालय या तिघांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘सेटर’कडून आलेला प्रस्ताव मंजूर करताना प्रत्येक कार्यालयातील अधिकार्यांचा ठरलेला हिस्सा घेतला जात होता. हे ३ ते ४० लाख रुपयांचे व्यवहार रोख स्वरूपात नियुक्तीपूर्वीच उरकले जात होते.
बँक पासबुक तपासून उघडणार खरे-खोटेपणा
या प्रकरणात आता संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यात जमा झालेल्या पगाराच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत. जुनी नियुक्ती आणि अलीकडचा पगार असल्यास, ती बोगस भरती असल्याचे स्पष्ट होईल.
चंद्रपूर प्रकरणातही संशयाचे सावट
या घोटाळ्यात अटक झालेल्या उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह भंडाऱ्याचे शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर हे दोघेही पूर्वी चंद्रपूर जिल्हा परिषदेत कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील शिक्षक भरतीवरही संशयाचे सावट आहे आणि लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे.
#शिक्षकभरतीघोटाळा #बोगसनियुक्त्या #नागपूरघोटाळा #शिक्षणविभाग #मुख्यमंत्र्यांचीदखल #FakeAppointment #EducationScam #TeacherFraud #MaharashtraNews #DigitalShetkari
फोटो