गवळीवाडीतील लोखंडी साकव ढासळला; गोपाळे कुटुंब अडचणीत
वाहाळावरचा एकमेव मार्ग धोकादायक; ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष, बांधकाम विभागाकडे निवेदन
रत्नागिरी वार्ताहर | लांजा प्रतिनिधी जितेंद्र चव्हाण
साटवली (ता. लांजा) येथील गवळीवाडीतील सखाराम गोपाळे आणि विवेक गोपाळे यांच्या घराकडे जाणारा वाहाळावरचा लोखंडी साकव १६ जून रोजीच्या मुसळधार पावसामुळे ढासळून गेला असून, सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत एका छोट्याशा आधारावर उभा आहे. हा साकवच त्यांच्या घराकडे जाणारा एकमेव मार्ग असल्याने रहदारी पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे.
या प्रकाराकडे साटवली ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच यांची प्रत्यक्ष भेट किंवा पाहणीसुद्धा झालेली नाही, असे सखाराम गोपाळे यांनी स्पष्ट केले.
४ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर परिस्थितीचे फोटो जि.प. बांधकाम विभाग, लांजा यांच्याकडे पाठवले आणि फोनवर संपर्क साधून माहिती दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
स्थानिक नागरिकांची मागणी आहे की, हा लोखंडी साकव तातडीने दुरुस्त करण्यात यावा आणि नवीन मजबूत साकव उभारून कोणत्याही संभाव्य दुर्घटनेला आळा घालावा.














