मत्स्यव्यवसाय विभागाकडून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा!
१८ ते २२ ऑगस्टदरम्यान वादळी वाऱ्याची शक्यता; समुद्रात जाणे टाळा!
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला असून वादळी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील मच्छीमारांनी सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने दिल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानुसार, १८ ते २२ ऑगस्टदरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५० किमीपर्यंत राहणार असून तो ६५ किमी प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे समुद्र आणखीनच खवळलेला राहणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील मच्छीमार, मच्छीमार सहकारी संस्था व नौका मालकांना तत्काळ सूचित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसरात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट परिसर व सातारा घाट परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
—
🔖 हॅशटॅग :
#मत्स्यव्यवसाय #मच्छीमार #हवामानइशारा #वादळीवारा #कोकण #रत्नागिरी #सिंधुदुर्ग #मुंबईपाऊस #WeatherAlert
📸 फोटो
—