कै. दत्तात्रय बिवलकर गुरुजी स्मरणार्थ जि. प. प्राथमिक शाळा वाटद रायवाडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
जि. प. प्राथमिक शाळा वाटद रायवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे सन २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांमुळे शाळेचा परिसर उत्सवमय झाला होता.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, नाटिका, भाषणे आदी सादर करून आपली कला व आत्मविश्वासाचा उत्कृष्ट परिचय करून दिला. विशेष आकर्षण ठरलेल्या छोट्या मुलांच्या बहुरंगी नमनाने उपस्थितांची मने जिंकली. विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सायंकाळी ७.०० वाजता पार पडला.
यावेळी कै. दत्तात्रय बिवलकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण ठेवत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बिवलकर गुरुजी यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर उत्तम संस्कार, शिस्त आणि प्रामाणिकपणाची शिकवण दिली. त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना घडवून समाजात आदर्श नागरिक म्हणून उभे केले.
या प्रसंगी त्यांच्या कार्याला उजाळा देताना पुढील ओळी सादर करण्यात आल्या —
“लहानपणीचे ज्ञान अमोल ठेवा,
संस्कारांची बीजे मनात रुजवा;
त्या पायावर उभा राहतो भवितव्य,
घडतो विद्यार्थी तेजस्वी, सक्षम आणि ध्येयवेडा.”
मी स्वतःही बिवलकर गुरुजींचा माजी विद्यार्थी असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात योग्य दिशा मिलाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बारगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच पाचीवाडीतील ग्रामस्थ, पालक व महिला वर्ग यांची मोलाची साथ लाभल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.















