समानतेच्या मूल्यांवर मुलांची जडणघडण झाली तर समाज बदलेल – ॲड. दिपक सोनावणे
नवीमुंबई (मंगेश जाधव)
बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३४ (मुंबई) अंतर्गत भिमाई महिला मंडळ, गोरेगाव यांच्या वतीने आंध्र प्रज्ञा संघ हॉल, जुने हनुमान नगर, गोरेगाव (पश्चिम) येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाकर फाउंडेशनचे संस्थापक ॲड. दिपक सोनावणे होते. त्यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाचा इतिहास सांगताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा विशेष उल्लेख केला. महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि संघटितपणे काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी बोलताना त्यांनी मुला-मुलींच्या जडणघडणीत समानता आणि संवेदनशीलतेची मूल्ये रुजवणे आवश्यक असल्याचे सांगितले. लहानपणापासून मुला-मुलींना समान वागणूक, संवाद आणि परस्पर आदर शिकवला तर भविष्यात महिलांवरील हिंसा व अन्याय कमी होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच महिलांनी एकत्र येऊन आपल्या प्रश्नांवर आवाज उठवणे आणि परस्परांना साथ देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन भिमाई महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यामध्ये अध्यक्ष संगीता धोत्रे, उपाध्यक्ष भक्ती जाधव, चिटणीस मनीषा लोखंडे, उपचिटणीस रोशनी गमरे आणि संदेश वाहक वंदना गायकवाड यांचा विशेष सहभाग होता. तसेच राज लोखंडे आणि भाकर फाउंडेशनचे मयुर जाधव हेही यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.















