नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठीच गोगावलेंना मंत्रीपद? भास्कर जाधवांचा महायुतीवर घणाघाती हल्ला
गुहागर (संदेश कदम)
महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या पदांचे वाटप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आमदार भास्कर जाधव यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
गुहागर तालुक्यातील पालपेणे येथे बोलताना भास्कर जाधव यांनी मंत्री गिरीश महाजन आणि भरत गोगावले यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत जाधव यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. नाशिकचे पालकमंत्रीपद म्हणजे भ्रष्टाचाराचे प्रमोशन असल्याचा आरोप त्यांनी केला.
याचवेळी भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीपदावरही जाधव यांनी सवाल उपस्थित केला. “नाशिकला खड्ड्यात घालणाऱ्या महाजनांनंतर आता मुंबई महामार्गाची वाट लावण्यासाठी गोगावलेंना आणले आहे का? नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठीच गोगावलेंची नियुक्ती झाली आहे का?” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून महायुती सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत असतानाच भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.










