काश्मीर पर्यटनासाठी गेलेले रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ जण सुखरूप; प्रशासनाच्या संपर्कात – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह
श्रीनगर, पहलगाम, कटारसारख्या ठिकाणी फिरायला गेलेल्या पर्यटकांशी नियंत्रण कक्षातून संपर्क; २५ व २६ एप्रिल रोजी परतीचा प्रवास
रत्नागिरी | तळवली (मंगेश जाधव)
काश्मीरमधील अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता होती. मात्र जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पर्यटक सुखरूप असून, जिल्हा प्रशासन त्यांच्या सतत संपर्कात आहे.
रत्नागिरीतील साक्षी संदीप पावसकर (वय २६) व रुचा प्रमोद खेडेकर (वय २१) या दोघी सिंधुदुर्गातील सहा नातेवाईकांसह २० एप्रिल रोजी काश्मीर पर्यटनासाठी रवाना झाल्या होत्या. हे सर्वजण आज, २३ एप्रिल रोजी रात्री मुंबईत पोहोचणार आहेत.
शिरगाव (रत्नागिरी) येथील खलिफ मुकादम व त्यांच्या कुटुंबातील एकूण सहा सदस्य अमृता ट्रॅव्हल्समार्फत काश्मीरमध्ये श्रीनगर येथे वास्तव्यास आहेत. हे सर्वजण २५ एप्रिल रोजी विमानाने परतीचा प्रवास करणार आहेत.
तर रत्नागिरी येथून श्री टुरिझममार्फत मनोज जठार, अनुश्री जठार यांच्यासह एकूण ३४ जण २१ एप्रिल रोजी काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. हे सर्व पर्यटक सध्या जम्मूतील कटार येथे सुरक्षित असून, उद्या २४ एप्रिल रोजी रेल्वेने दिल्लीमार्गे परतीचा प्रवास करणार असून, २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत पोहोचतील.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आला असून, सर्वजण सुखरूप असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हॅशटॅग्स:
#RatnagiriTourism #KashmirTrip #TouristsSafe #DevendraSingh #RatnagiriNews #TourismUpdate #SafeTravel
फोटो