मान्सून काळात आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी महाराष्ट्र सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस
राज्यभरातील यंत्रणा अलर्ट; लष्कर, नौदल, हवाई दल, महापालिका, पोलीस, एनडीआरएफसह सर्व विभाग सज्ज
बातमी.
मुंबई | मान्सूनच्या काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा प्रभावी सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रालयात झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्यांनी सर्व प्रशासनाला २४ तास सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
“आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. तात्काळ प्रतिसादासाठी यंत्रणांची कार्यपद्धती अधिक प्रभावीपणे राबवावी,” असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगली-कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांनी विशेष तयारी ठेवावी, अशी सूचना केली. दरड प्रवण क्षेत्रांचे नव्याने मॅपिंग करणे आणि फ्लॅश फ्लडसाठी आराखडा तयार करण्यावरही त्यांनी भर दिला.
मुंबईत दरड प्रवण २४९ ठिकाणी तातडीने उपाययोजना, मॉकड्रिल, धोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतर, धरणांतील पाण्याच्या विसर्गासाठी आंतरराज्य समन्वय, पूरप्रवण भागांत राशन साठा व गर्भवती महिलांचे स्थलांतर यासारख्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत लष्कराच्या ३८ तुकड्या, नौदल व हवाई दलाची सज्जता, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टगार्ड, रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, महापालिका, पोलीस यांची तयारी सादर करण्यात आली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महापालिकांनी नालेसफाई, दरड प्रवण भागात संरक्षणासाठी जाळ्या, धोक्याचे फलक आणि पर्यटकांना रोखण्याच्या सूचना केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, मकरंद पाटील, आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हॅशटॅग्स:
#महाराष्ट्रमान्सून #आपत्तीनिवारण #मुख्यमंत्रीफडणवीस #आपत्तीव्यवस्थापन #MonsoonPreparedness #DisasterManagement #NDRF #SDRF #MumbaiRain
फोटो