पालकमंत्री डॉ. उदय सामंतांच्या हस्ते खैर वृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप
शेतकऱ्यांसाठी चिपळूणमध्ये शनिवारी विशेष कार्यक्रम
रत्नागिरी: वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते खैर (Khair) प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी चिपळूण येथे केले जाणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी १० ते ११.३० या वेळेत चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. या वाटपाच्या कार्यक्रमासोबतच वन वणवा प्रतिबंधात्मक उपाययोजना कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण विभाग) रणजित गायकवाड आणि विभागीय वन अधिकारी (प्रा.) गिरिजा देसाई यांनी दिली.
या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, विधान परिषद सदस्य आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, तसेच विधानसभा सदस्य आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आणि आमदार किरण सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे हेही अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या खैर वृक्षांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देईल आणि पर्यावरणाच्या संरक्षणातही मदत करेल अशी अपेक्षा आहे.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.