सिंधुरत्न समृद्ध योजनेला गती; भाट्येत हाऊसबोट टर्मिनल, २५ कोटींचे मत्स्यालय आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक; आरोग्य, क्रीडा, पर्यटन व प्रशिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रस्तावांवर भर देण्याच्या सूचना
रत्नागिरी | प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटन, कृषी प्रक्रिया उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. भाट्ये येथे हाऊसबोट टर्मिनल उभारून पर्यटकांसाठी हाऊसबोट प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, काजू बोंडापासून ज्यूस, सिरप व इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी २५ बचतगटांच्या क्लस्टरच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार आहे. तसेच २५ कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक आणि पर्यटनाला पूरक असे मत्स्यालय उभारण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला माजी आमदार तथा समितीचे उपाध्यक्ष विनय नातू, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मागील सिंधुरत्न योजनेअंतर्गत मंजूर कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडे उपलब्ध निधी, पूर्ण झालेली व प्रलंबित कामे तसेच अपूर्ण कामांची कारणे यावर चर्चा करण्यात आली.
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या बांबूच्या लागवडीसाठी संशोधन व सुविधा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच काजू बोंडापासून ज्यूस, सिरप आणि इतर अन्नप्रक्रिया उत्पादने तयार करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), सिंधुरत्न योजना आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या समन्वयातून २५ बचतगटांचा क्लस्टर तयार करून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यास सांगितले.
भाट्ये येथे उभारण्यात येणाऱ्या हाऊसबोट टर्मिनलमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. या प्रकल्पातून मिळणारा नफा प्रभाग संघांना देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
याशिवाय २५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारे मत्स्यालय हे केवळ मत्स्यालय न राहता जिल्ह्याचे आकर्षक पर्यटनस्थळ बनावे, यासाठी दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करताना आरोग्य, क्रीडा, पर्यटन आणि कौशल्य प्रशिक्षण या क्षेत्रांना प्राधान्य देण्याचे निर्देश देत, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळेल, अशा प्रकारचे प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले.
बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.









