शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती आवश्यक: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी
रत्नागिरी शहराला सणांपूर्वी खड्डेमुक्त करा! #RatnagiriRoads #RepairNow
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील अंतर्गत डांबरी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यांमुळे होणारा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास लक्षात घेता, तसेच आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या रत्नागिरी शाखेने रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष मिलींद किर, शहराध्यक्ष निलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर, सरचिटणीस रणजित शिर्के आणि मनोहर गुरव हे उपस्थित होते.
नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे होणारा मनस्ताप आणि सणांच्या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने व्यक्त केली
आहे.
















